महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ऑक्टोबर) : हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, नांदे आणि कासारसाई या गावांसाठी संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भातील प्रस्तावावर बुधवारी नगरविकास मंत्र्यांकडे प्राथमिक चर्चा झाली आहे.
संयुक्त नगरपरिषद स्थापन करण्याबाबत विभागीय आयुक्त यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर तो अहवाल आणि त्याचबरोबरच पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद यांचे अभिप्राय घेऊन मगच अंतिम निर्णय घेण्याच्या या बैठकीत ठरले.
हिंजवडी येथे आयटी पार्क देशातील मोठ्या आयटी पार्क पैकी एक आहे. त्या ठिकाणी अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. त्यामुळे या आयटी पार्कमध्ये कामानिमित्त हजारो नागरिकांची ये-जा असते. तसेच या परिसरात नागरीकीकरणही वेगाने वाढत आहे. या गावांमध्ये ग्रामपंचायत असल्याने पायाभूत सोयी-सुविधा उभारण्यावर मर्यादा येतात. वेगाने नागरीकरण होणाऱ्या या परिसराचा सुनियोजित विकास करण्यासाठी नगरपरिषद स्थापन करण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून हालचाली सुरू आहेत. या संदर्भात बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी ऑनलाईनद्वारे उपस्थिती होते.
या सहा गावांचा समावेश पीएमआरडीएच्या हद्दीत होतो. पीएमआरडीएने त्यांच्या हद्दीचा प्रारूप विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, ही गावे पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट करण्याची चर्चा मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्यावर अजून निर्णय झालेला नसताना नगरपरिषद स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
विभागीय आयुक्त यांच्या अहवालासह स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी आणि पीएमआरडीए यांची मते जाणून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय होणार आहे. आज केवळ या प्रस्तावावर प्राथमिक चर्चा झाली.
3 Comments