महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५ सप्टेंबर) : राज्यभरात गेले पाच दिवस चैतन्याच्या वातावरणात सुरू असलेल्या गणेशोत्सवात घरगुती गौरी-गणपतीचे आज सोमवारी उत्सवात विसर्जन केले जाणार आहे. यंदा मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींचा सण पार पडला. शनिवारी 3 सप्टेंबरला पहिल्या दिवशी राज्यभरात मोठ्या उत्साहात ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातही जिकडे तिकडे मोठ मोठ्या गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यामध्ये गौरींची स्थापना करुन त्यांचे मनोभावे पूजन करण्यात आले. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. प्रत्येक कुटुंबात आपल्या कुलाचाराप्रमाणे गौरी बसविल्या जातात.
नवी सांगवी समता नगर मधील सौ. जयश्री पाटील यांनी गौरी सजावटीसाठी देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘आझादी का अमृतमहोत्सव’ हा देखावा सादर केला असून यामध्ये रणभूमीवर वापरलेल्या वेगवेगळ्या प्रकारचे आयुध आणि छायाचित्रे मांडण्यात आली असून युद्धभूमीवर लढताना आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या विरपुत्रांचे फोटोही लावले आहेत, हे सर्वच डोळे दिपवून टाकणारे दृश्य नवी सांगवीकरांचे लक्ष वेधून घेत होते, ते पाहण्यासाठी अनेक महिलांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते.
गणपतीच्या आईचे म्हणजेच गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविण्यात येते. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची सजावटही करण्यात येते. कोणी फुलांची आरास करतात. तर कोणी दिवे आणि थर्माकॉलच्या मखरात गौरीला बसवतात. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडूच्या, पितळ्याच्या, कापडाच्या, फायबरच्या असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. हे तर सगळेच करतात, परंतु जयश्री पाटील यांच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत होते.
यावेळी बोलताना ‘जयश्री कृष्णा पाटील‘ म्हणाल्या, यावर्षी देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष पूर्ण झाली, देशभर हा उत्सव अमृतमहोत्सव म्हणून साजरा करण्यात आला, आपणही काहीतरी वेगळे करावे असे वाटले, आणि ही संकल्पना सुचली, मला या कामात माझा मुलगा तेजस चे खूपच सहकार्य मिळाले आणि आम्ही सर्व कुटुंबाने हा देखावा बनवला याचा खूप आनंद होतो आहे.