Google Ad
Editor Choice

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगवी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या १२१ गणेश मंडळाची पोलिस प्रशासनासमवेत आढावा बैठक … दिल्या या सूचना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० ऑगस्ट) : गणेशोत्सव म्हटले की, ढोल-ताशांचा गजर आलाच. गतवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकांवर बंदी होती. उत्सवावरही मर्यादा आल्या होत्या. सध्या दैनंदिन जीवन सुरळीत सुरू असून, वादनालाही परवानगी आहे. त्यामुळे उत्सवप्रेमी यंदाचा गणेशोत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे. मागील दोन वर्षांची कसर यंदा भरून काढण्याची तयारी या पथकांकडून सुरू आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगवी येथे सांगवी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या १२१ गणेश मंडळाची पोलिस प्रशासनासमवेत आढावा बैठक होऊन सुरक्षात्मक, नागरी आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेतील त्रुटी निकाली काढण्यावर चर्चा झाली. यामध्ये सांगवी, नवी सांगवी , पिंपळे गुरव, पिंपळे निळख, पिंपळे सौदागर या भागातील मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या समस्या पोलिस निरीक्षक सुनील टोनपे यांच्या पुढे मांडल्या त्यावेळी गणेश मंडळे आणि पोलिस प्रशासन यांनी मिळून यावर्षीचा सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे कसा पार पाडता येईल अशी सहकार्याची भूमिका घेतली.

Google Ad

यावेळी गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना सांगवी पोलिस ठाण्याचे मुख्य पोलिस निरीक्षक सुनिल टोनपे म्हणाले, ”दोन वर्षांचा काळ अत्यंत खडतर गेला. कोरोना असल्याने उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या; पण सध्या वातावरण निवळल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा दहीहंडी व गणेशोत्सव उत्साहात साजरा करता येणार आहे. उत्सव साजरा करताना नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची खबरदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. सण उत्साहात व आनंदात साजरा करावा. ”शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींनुसार उत्सव साजरा करावा. धार्मिक सण उत्साहात साजरे करावेत, यावेळी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, जातीय सलोखा राखावा याची काळजी घ्यावी; तसेच कुठेही गालबोट लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. उच्च आवाज क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर टाळावा. पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.

सामंजस्याने प्रश्न सोडवू
डीजेची मागणी गणेशभक्तांनी करणे स्वाभाविक आहे. कायद्याचे पालन करत न्यायालयाने घालून दिलेली बंधने पाळणेही गरजेचे आहे, शिवाय वरिष्ठांकडून काही आदेश आले तर वेळोवेळी बदल केले जातील. ते व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातून सर्वाना कळवण्यात येतील. मनपा, महावितरण, वाहतूक विभाग यांच्या परवानाग्या एकाच ठिकाणी कशा देता येतील याविषयी त्या त्या विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल.  विसर्जन मिरवणुकीतही काही कर्मचारी नियुक्त करून वाहतूक कोंडी होणार नाही, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, दरम्यान मंडळांना पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असून, विसर्जन मिरवणुकीतही पोलिसांच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

या आढावा बैठकीस रावसाहेब चौगुले, दिलीप तनपुरे, प्रशांत सपकाळ, राजू सावळे, दीपक ढोरे, सुरेश सकट, सखाराम रेडेकर , शहाजी पाटील , संदीप दरेकर, महेश भागवत, साई कोंढरे, राजू नागणे, राजेंद्र पाटील पत्रकार संतोष महामुनी तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!