महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ मे) : मानवी आयुष्याचा भवताल कितीही काळाकुट्ट असला तरीही जिद्द , चिकाटी , आणि स्वतःवरील विश्वासाच्या बळावर आभाळालाही कवेत घेण्याचं स्वप्न पाहून ते साकारता येतं . असं स्वप्न साकारलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व वाचक उपयोगी , संशोधनात्मक लेखन करणारे साहित्यिक म्हणजे लेखक श्रीकांत चौगुले यांचा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या जीवन शिक्षण या मासिकाच्या संपादनासाठी संपादन मंडळ सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने उद्योजक विजूशेठ जगताप यांच्या हस्ते कासारवाडी येथील श्री साई दत्तसेवा कुंज आश्रम येथे सन्मान करण्यात आला यावेळी शिवानंद स्वामी महाराज, सुभाष दादा काटे, श्री डुंबरे उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्य क्षेत्रातील आद्यसंस्था. या संस्थेच्या वतीने प्रथमा, प्रवेश, प्राज्ञ व साहित्य विशारद या परीक्षा घेतल्या जातात. यापैकी काही परीक्षांचे अभ्यासक्रम बदलण्याचे काम सुरू आहे.चार वर्षांपुर्वी विशारद परीक्षेचा अभ्यासक्रम श्रीकांत चौ गुले यांनी तयार केला. आता इतर परीक्षांचे अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या समितीवरही त्यांची निवड केली.
लहानपणी मित्रांकडून विनंती करून पुस्तके , मासिके घेऊन वाचनाची आवड जोपासून लेखनात कारकीर्द घडवून तब्बल दहा ग्रंथांचे लेखनही त्यांनी केले आहे. त्यांनी २००३ साली पिंपरी – चिंचवडच्या इतिहासावर आधारित ‘ पिंपरी चिंचवड गाव ते महानगर ‘ हा ३०० पानांचा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला . या ग्रंथाचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले . ‘ आपले सण , आपली संस्कृती ‘ या उपयुक्त माहिती देणाऱ्या त्यांच्या ग्रंथाची पंचविसावी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे . तर , अंदमानबद्दल माहिती देणाऱ्या ‘ क्रांतितीर्थ अंदमान ‘ या ग्रंथाचा इतर भाषेत अनुवादही झाला . याशिवाय ‘ शिक्षण संस्कार ‘ , ललित लेखसंग्रह ‘ घरदार ‘ , गणपतीच्या रूपांची माहिती देणारा ‘ बाप्पा मोरया ‘ , ‘ आपलं पिंपरी चिंचवड ‘ अशा विविध विषयांवर संशोधनात्मक ग्रंथांचही त्यांनी लेखन केले .