महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात लॉकडाऊनसदृश्य अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. पण तरीही रुग्णसंख्या अपेक्षित अशी कमी होताना दिसत नाही. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केले आहे. ‘येत्या काळात आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी कोणत्याही परिस्थितीत उद्योगधंदे सुरूच राहायला हवेत’, असे महत्त्वपूर्ण निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेऊन चर्चा केली. ते म्हणाले, ‘राज्यातील कडक निर्बंधांमुळे काही प्रमाणात रुग्णसंख्या स्थिरावली असली तरी आपल्याला आता अतिशय सावध राहून पुढील तिसऱ्या लाटेचे नियोजन करावे लागेल.
येत्या काळात आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी कोणत्याही परिस्थितीत उद्योगधंदे सुरूच राहायला हवेत. कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्या कमी होते असे नाही. तरीही वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्णवाढ आपण रोखू शकलो’, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
🔴लसीकरणासाठी नियोजन करावे
कोरोना व्हायरसची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्त्वाचा आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा अतिशय गरजेचा आहे. आपण आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली. मात्र, पुरवठ्यावर त्याचे नियोजन करावे लागेल, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
🔴परराज्यांतून येणाऱ्या मजुरांची नोंद ठेवा
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल. मात्र, ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी जे प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, कंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत धोरण ठरवता येईल, असेही ते म्हणाले.
71 Comments