महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ जुलै) : महानगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. माजी नगरसेवक पुन्हा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत, तसेच नव्याने लोकप्रतिनिधी होऊ पाहणाऱ्या इच्छुकांची रांग पण मोठी आहे. पण यावर्षी निवडणूकांबाबत अनिश्चितता असल्यामुळे कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी आखाड जेवणाच्या पंगतच करू की नको अशा बेतात काहीजण आहेत. एरव्ही निवडणूका म्हटल्यावर ‘आखाड पार्टी’चे आयोजन करण्यासाठी चढाओढ पहायला मिळत असायची. पण यावर्षी ‘आखाडाचा हंगाम’ तसा थोडा शांतच वाटतोय …
कधी एकदा निवडणूकीचा दिवस उजाडतोय, अन् मी अर्ज भरतोय.. अशा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या काही इच्छुकांसह कसलेले नगरसेवक तयारीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी काहीतरी संधी शोधत होतेचं. त्यात चालून आषाढ (आखाड) महिना आला, मात्र राज्यातील राजकीय उलथापालथ, ओबीसी आरक्षण, सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग यांच्या कारभारात निवडणूक पुढे मागे होत असल्याने पुन्हा एकदा या इच्छुकांचा हिरमोड झाला अन, त्यात खर्च केला तर पदरात काहीतर पडले पाहिजे असं गणित मांडणारे इच्छुक …
तस पहायला गेल तर आखाड महीना प्रत्येक वर्षी येत असतो, मात्र दर पाच वर्षातून येणारा आषाढ महीना हा राजकीय व्यक्तींसह कार्यकर्त्यांकरीता महत्त्वाचा असतो, विशेष चर्चेचा असतो. यंदाचा आषाढ महीना हा निवडणूक वर्षातला असल्याने याला राजकीय महत्व आहे. मतदारांना लुभावण्यासाठी भावी नगरसेवकांकडून आखाडीचा बेत आखला जात आहे. कारण तसं नसतं तर दरवर्षी आखाड जोरात साजरा झाला असता … हे काही वेगळं सांगायला नको !!
निवडणूकीची तारीख पुढील ढकलली गेली असली तरी निवडणुक या एक – दोन महिन्यात होणार हे निश्चित असल्याने यंदाच्या आखाडींच्या पंगतींना बहर येउ लागला आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा संपल्यानंतर ते अमावस्यापर्यंत या आखाडीचा डाव सुरू असणार आहे. शुक्रवारपासून या आखाडीच्या पंगती उठू लागल्या आहेत.
‘मतदारांसाठी काय पण’ … हे लक्षात घेउन त्याला मटण, चिकण, मासे यांची मेजवाणी सुरु आहेत. फार्म हाऊस, इमारतीचे पार्कींग, टेरिस, आडोशाला असलेल्या पत्र्यांची शेड, शेतातील वस्ती या ठीकाणी होत असलेल्या आखाडींची चर्चा असून आज कोणाच हाय र रं … हे कार्यकर्ते विचारुन आपल्या नेत्यांच्या आखाडीची तारीख निश्चीत करताना दिसत आहेत. गुरुपौर्णीमेनतर शहरातील प्रत्येक प्रभागातील चौकात चौकातून आता रात्री आठ नंतर मटन, चिकन, मासे याचा घमघमाट येऊ लागला आहे. हे चित्र गटारीपर्यंत वाढत जाईल यात शंका नाही. सर्वत्र मतदार मात्र दर पाच वर्षातून येणाऱ्या या अनोख्या आखाडीचा आनंद लुटताना दिसत आहेत.