महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१०ऑगस्ट) : आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसारासाठी मोठं कार्य केलं. बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली होती.
लोणावळ्याजवळील कार्ला येथील ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली. अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांनी उपचार केले. विविध आयुर्वेदिक औषधांची संशोधन करुन त्यांनी निर्मितीही केली. त्यांच्या देशभरातूनच नव्हे तर परदेशातूनही रुग्ण उपचारासाठी येत असत.
काही दिवसांपूर्वीच बालाजी तांबे हे एबीपी माझाच्या प्रसिद्ध अशा माझा कट्टा या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक किस्से एबीपी माझाच्या प्रेक्षकांसोबत शेअर केले होते. मोठ्या कष्टाने त्यांनी ‘आत्मसंतूलन व्हिलेज’ निर्मिती केली होती. जागा खरेदी करण्यासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. दागिने गहाण ठेऊन जागा विकत घेतली मात्र तेथे पूर्ण बांधकाम करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे सुरुवातीला येणाऱ्या रुग्णांसाठी एमटीडीसीचे बंगले भाड्याने त्यांनी घेतले होते. त्यानंतर हळूहळू मिळणाऱ्या पैशातून आश्रमाची उभारणी केली, अशी माहिती डॉ. बालाजी तांबे यांनी दिली होती.
11 Comments