महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जुलै) : “शेतकरी, बियाणे, खते, पिक वीमा, वीज, पाऊस, पुर, कोरोना, लॉकडाऊन, अडचणी आलेले अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण असे राज्यासमोर अनेक प्रश्न आ-वाचून उभे आहेत. मात्र, सगळे प्रश्न कोमात आणि सरकारमधील तीन पक्षांमध्ये स्वबळाची छमछम जोमात, असे चित्र राज्यात आहे,” अशी खरमरीत टीका भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.
ते आज (21 जुलै) पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी संघटनात्मक आढावा बैठका घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आशिष शेलार म्हणाले, “रोज सकाळ-संध्याकाळ तीन पक्षांमध्ये एकच चर्चा ती म्हणजे आम्ही “स्वबळावर लढणार, आम्ही स्वबळावर लढणार. एक म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरे त्यावर अग्रलेख लिहिणार, मग तिसरे दुसऱ्याला भेटायला जाणार, मग सगळे एकत्र भेटतात. ही अशी सगळी स्वबळाची छमछम सोडली, तर राज्यात दुसरे काहीच ऐकायला येत नाही.
हा दुसरे काही येत असेल तर लेडीज बारची छमछम ऐकू येते. हे मिडियानेच काल उघड केलं. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न असून त्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी नाही.” पोलिसांकडून राज्यात वसुलीचं काम सुरू आहे. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की स्वबळ असे करतात, कोण दिल्लीला जातं, तर कोण बैठक घेत आहेत. महाविकास आघाडीमधील नेते सकाळी उठले की 108 वेळा स्वबळाचा मंत्र जपत आहेत, असा टोला शेलारांनी लगावला.
65 Comments