Google Ad
Editor Choice

महापालिका निवडणुकीत शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणणार – अजित गव्हाणे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. 3 जून ) :  पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रत्येक कामांत गैरव्यवहार केल्याने शहराची पुरती अधोगती झाली. गेल्या पाच वर्षांतील भाजपच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. शहराचा पुन्हा विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातूनच होवू शकतो याची खात्री मतदारांना असल्यामुळे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात अजितभाऊ गव्हाणे बोलत होते. पुढे बोलताना गव्हाणे म्हणाले, गतवेळी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी शहरवासियांना भूलथापा मारल्या आणि खोटी आश्वासने दिली. महापालिकेत सत्ता आल्यानंतर दिलेल्या आश्वासनांपैकी एकही काम ते करू शकले नाहीत. महापालिकेत गेल्या पाच वर्षांत झालेल्या प्रत्येक कामांत भ्रष्टाचार करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. भाजपच्या लाचखोरी, खंडणीखोरी आणि भ्रष्टाचारामुळे शहराची पुरती अधोगती झाली. शहरातील तरुणांना त्याची मोठी झळ पोहोचली आहे. शहरातील जनतेलाही विकास आणि भ्रष्टाचाराची जाणिव झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागस्तरावर मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. प्रभागरचना आणि आरक्षणही आपल्याला अडचणीचे ठरणार नसल्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आपलाच महापौर होईल याची खात्री आहे. जुन्या-नव्या पदाधिकाऱ्यांसह तरुणांना अधिकची संधी दिली जात असल्याने पक्षामध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. ‘पिंपरी चिंचवडच्या विकासाला हवी, पुन्हा वादळी गती, आपली राष्ट्रवादी’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत. कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा विश्वास यावर महापालिकेत सत्ता येईल, असा विश्वासही गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपकडून भ्रष्टाचाराचा कहर – बहल
गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेची अक्षरश: लूट केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे समन्वयक तथा प्रवक्ते योगेश बहल यांनी केला. ते म्हणाले, करोना काळात भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी अक्षरश: महापालिकेची लूट केली. त्यानंतर कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार केला. शिक्षणमंडळ, आरोग्य, वैद्यकीय विभाग, स्मार्ट सिटी सेंटरसारख्या प्रत्येक प्रकल्पात भ्रष्टाचार केला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना शहरातील जनता यावेळी थारा देणार नसून महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचा दावाही योगेश बहल यांनी यावेळी केला.
संपूर्ण शहर ‘राष्ट्रवादीमय’
एप्रिल महिन्यात होणारा उपमु ख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहर दौरा शुक्रवारी (दि. ३) पार पडला. या दौऱ्याच्या अनुषंगाने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण तयारी करण्यात आली होती. गेल्या पाच वर्षांतील राष्ट्रवादीचा हा सर्वांत मोठा यशस्वी कार्यक्रम ठरल्याचे पहावयास मिळाले. खचाखच भरलेल्या रामकृष्ण मोरे सभागृहात त्याची प्रचिती आली. अक्षरश: पाय ठेवायलादेखील जागा सभागृहात शिल्लक राहिली नव्हती.
गेल्या पाच वर्षांत या सभागृहात सर्वाधिक गर्दीचा हा कार्यक्रम ठरला. तर दौऱ्यापूर्वी शहरात लावण्यात आलेले फलक, होर्डिंग्जही लक्षवेधक ठरले. शहर पातळीवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षातील एकीचे दर्शनही पहावयास मिळाले. लक्षवेधक फलकबाजी, टिकेपेक्षा शहर विकासावर केलेले भाष्य, खचाखच भरलेला हॉल, कार्यकर्त्यांमधील उत्साह यामुळे आजचा कार्यक्रम सर्वाधिक यशस्वी ठरल्याची तसेच ‘राष्ट्रवादीमय शहराची’ चर्चा सगळीकडे रंगली होती.
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!