महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ ऑगस्ट) : महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या 24 तासात राज्यभरात धुवाधार पाऊस सुरू असतानाच 11 ऑगस्टपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
बंगालच्या उपसागर भागात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासात तीव्र होत डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चांगल्या पावसाची शक्यता आहे.विदर्भातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाची चिन्ह आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपुरात काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोलीत एक-दोन ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान केंद्राने दिली.
राज्यातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, रायगड पुणे, कोल्हापूर, सातारा आणि गडचिरोलीत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर सिंधुदुर्ग, नाशिक, नांदेड, हिंगोली, परभणी, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर येथे ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तसेच नंदुरबार, जळगाव, जालना, बीड, लातूर यासोबतच विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केलाय.