महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, २५ ऑगस्ट २०२५ : चऱ्होली येथील वडमुखवाडी परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेट स्थळी उभारण्यात आलेल्या भव्य ध्वजस्तंभावरील ध्वजपताका पावसाळ्यात होणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे दिनांक १५ ऑक्टोबर पर्यंत उतरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चऱ्होली येथील वडमुखवाडी स. क्र. ७८ येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीवर आधारित उभारलेला भव्य ध्वजस्तंभ हा शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. या परिसरात उभारलेल्या या ध्वजस्तंभाची उंची तब्बल ६० मीटर (२०० फूट) आहे.

या ध्वजपताकाचे माप १८.३ मीटर x १२.२ मीटर (४२ फूट x ३४ फूट) असून हा ध्वज परिसरातील वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यामुळे (Wind Load) ध्वजपताका फाटण्याची तसेच तिरप्या झोतामुळे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेतर्फे सदर ध्वजपताका दिनांक १५ ऑक्टोबर पर्यंत उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या कालावधीत ध्वजस्तंभावर ध्वजपताका नसली तरी हा स्तंभ यथास्थित राहणार आहे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा ध्वजपताका औपचारिकरित्या फडकविण्यात येईल, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


