महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ डिसेंबर) : दिव्यांग बांधवांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक होत आहे. सुसंवाद आणि मानवी संवेदनेतून हा बदल घडत असतो. शहरातील दिव्यांग बांधव आणि दिव्यांग संघटनांसमवेत सुसंवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी समाजातील हजारो हात सातत्याने प्रयत्न करीत असून दिव्यांग बांधवांना सर्वार्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी अधिक व्यापक आणि बदलत्या काळाशी समरुप होऊन त्यांना समाजात आणण्याची प्रयत्न करत आहेत. त्यातील एक कासारवाडी येथील श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम होय.
आज रविवारी (दि.०४) जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून ‘पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट‘ संचलित ७५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमाच्या वतीने बसने आणण्यात आले,विद्यार्थ्यांनी मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचे दर्शन घेतले यानंतर सर्वांना कीर्तन सोहळ्यात भाग घेण्याची संधी उपलब्ध करून त्या विद्यार्थ्यांना भजनाचा आनंद दिला, विद्यार्थ्यांनी गळ्यात टाळ घेत मृदुंगाच्या तालावर ठेका धरत भजन म्हटले, तो क्षण डोळे दिपवून टाकणारा होता. ‘असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी’ पण हे सर्व विद्यार्थी दृष्टी नसूनही सर्व सृष्टीचा आनंद घेत होते.
आपण दररोजच्या जीवनात अनेक ठिकाणी जाऊन वेगवेगळे कार्यक्रम पहात असतो, पण अनाथ दिव्यांग यांच्या नशिबात या गोष्टी खूपच कमी असतात हेच ओळखुन, समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आश्रमाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे श्री शिवानंद स्वामी महाराज, विजयशेठ पांडुरंग जगताप, सुभाषदादा काटे, अरुण काटे यांनी स्वागत केले, तसेच या सर्वांनी या दिव्यांग विद्यार्थ्यांबरोबर स्नेह भोजनाचा आनंदही घेतला. असा हा आगळावेगळा चांगला उपक्रम राबविल्याने परिसरात या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.